सोशल - EVM मेहरबान तो... हार्दिक यांच्या सवालावर प्रतिक्रियांचा पाऊस

फोटो स्रोत, Getty Images
ईव्हीएम वापरून देखील निवडणुकीचा निकाल उशीराने येत असेल तर ईव्हीएमचा उपयोग काय? असा सवाल पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी केला आहे. यासंदर्भात त्यानी काही ट्वीट्स केली.
निवडणुका जलद पार पडाव्यात यासाठी ईव्हीएमचा वापर केला जातो. मात्र निवडणुका संपल्यानंतर 7-8 दिवस ती मशिन्स बंद खोलीत ठेवण्यात येतात. यापेक्षा बॅलेट पेपरचा वापर करणं कधीही चांगला. त्यालाही तेवढाच वेळ लागतो, असं हार्दिक यांनी म्हटलं आहे.
हार्दिक पटेल यांच्या या मतांबद्दल काय वाटतं, असा प्रश्न आम्ही वाचकांना विचारला होता. बीबीसीच्या फेसबुक पेजवर यावर व्यक्त झालेल्या मतांचा हा गोषवारा.
प्रणीव शेंडे यांनी "हरणारा नेहमीच इव्हीएमच्या नावाने गळे काढतो", असं म्हटलं आहे. तसंच, "ईव्हीमबद्दल शंका उपस्थित करणारे आपले अपयश झाकण्यासाठी तसा बनाव करत असल्याचंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
संदीप पाटील यांनी हार्दिक पटेल यांच्या विधानाचं समर्थन करत निवडणूक आयोगाची आणि आयुक्तांची भूमिका संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Facebook
"ही शक्यता नाकारता येत नाही," असं म्हणत अनिरुद्ध पाटील यांनी हार्दिक पटेल यांच्या म्हणण्याला पाठिंबा दिला आहे. अनेकांनी हार्दिक पटेल यांचं मत बरोबर असल्याचं म्हटलं आहे.
"हा घोटाळा आहे हे सिद्ध करून दाखवा, नाहीतर आपला पराभव स्वीकारा," असं भानूदास यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Facebook
"भाजप सोडलं तर, सगळ्यांचा ईव्हीएमवर अविश्वास आहे. मात्र हॅक करायला सांगितलं तर कोणीही पुढे येणार नाही. काही जागी ईव्हीएममध्ये दोष आढळला, परंतु संपूर्ण गुजरातमध्ये ईव्हीएम दोषपूर्ण आहेत हे म्हणणं चुकीचं आहे," असं मत सौरभ निंबार्टे यांनी मांडलं आहे.

फोटो स्रोत, Facebook
"एक्झिट पोलचे अंदाज खरे झाले, तर आता ईव्हीएमवर खापर फोडायला सगळे मोकळे", असं मत सुनील कांझरकर यांनी व्यक्त केलं आहे. यशोधन जोशी यांनी हार्दिक यांना त्यांच्या पराभवाची खात्री वाटतं असल्याचं म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















