पाकिस्तानमध्ये IAF कारवाईचा ग्राउंड रिपोर्ट; नाणार प्रकल्प रद्द; OICमध्ये भारताला मान: बीबीसी मराठी राउंडअप

नाणार, रत्नागिरी
फोटो कॅप्शन, नाणार प्रकल्प रद्द करण्यात आला आहे.
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

1. 'नाणार प्रकल्प रद्द झाल्याने राज्यातील गुंतवणुकीवर विपरीत परिणाम'

रत्नागिरी येथील नियोजित नाणार रिफायनरीचा प्रकल्प रद्द करण्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली. या प्रकल्पासाठी ज्या जागा अधिग्रहित करण्यात आल्या होत्या, त्याही परत केल्या जाणार आहेत.

हा प्रकल्प ज्या भागातील नागरिकांना हवा असेल, तिथं सुरू करण्यात येईल, असंही देसाई यांनी सांगितलं. शिवसेना आणि भाजप यांच्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा होत असताना हा प्रकल्प नाणारमधून हलवण्याचं सूतोवाच करण्यात आलं होतं.

2. पाकिस्तानात IAFच्या हवाई हल्ल्यात नेमके किती ठार झाले?

26 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा भागातील बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण तळाला लक्ष्य केल्याचं भारताने सांगितलं. या कारवाईत तिथे असलेल्या अनेक अतिरेक्यांना ठार केल्याचा दावा भारताने केला.

जैश ए मोहम्मद

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक चित्र

मात्र तिथे कुठलंच प्रशिक्षण शिबीर नव्हतं, असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. "भारताने एका निर्मनुष्य ठिकाणी बाँब टाकले आणि पाकिस्तानी हवाई दलाने उत्तरादाखल केलेल्या कारवाईनंतर भारताच्या लढाऊ विमानांनी पळ काढला," असं पाकिस्तानने म्हटलं होतं.

पाकिस्तानने आपल्या दाव्यांची सत्यता दाखवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मीडियाला बालाकोटमधल्या जाबामध्ये नेलं. तिथे बीबीसी, अल झजिरा आणि रॉयटर्सने नेमकं काय पाहिलं? वाचा हे ग्राउंड रिपोर्ट

3. अभिनंदनच्या सुटकेने प्रचार युद्धात कुणाची सरशी?

'शांतीच्या उद्देशाने' आपण भारतीय पायलटच्या सुटकेची घोषणा करत असल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितलं.

इकडे दिल्लीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांच्या एका बैठकीत या इम्रान खान यांच्या या घोषणेवर उपहासात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. 'पायलट प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे. आता आम्ही खरी कामगिरी करू."

अभिनंदन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विंग कमांडर अभिनंदन

पाकिस्तानमधून भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका झाल्यानंतर काश्मीरमधील हल्ल्यानंतर दोन अण्विक शक्तींत निर्माण झालेला तणाव कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पण या संपूर्ण संकट काळात जी धारणांची लाढाई सुरू होती ती कुणी जिंकली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी?

4. स्पेसएक्स : अवकाश सफरीचं स्वप्न पूर्ण होणार?

अवकाश संशोधन क्षेत्रात कार्यरत असणारी खासगी संस्था स्पेसएक्स (SpaceX) अवकाशात माणूस नेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कॅप्स्यूलचं प्रक्षेपण केलं आहे. फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून हे प्रक्षेपण झालं आहे.

व्यावसायिक पातळीवर अवकाश पर्यटनाच्या दृष्टीने हा पहिला टप्पा आहे, असं स्पेसएक्सचे संस्थापक इलॉन मस्क यांनी म्हटलं आहे. जर हे प्रक्षेपण यशस्वी झालं तर नियमितपणे आंतराळवीरांना अवकाशात नेण्यासाठी या कॅप्स्यूलला परवानगी मिळू शकते.

5. इस्लामिक राष्ट्रांच्या परिषदेत भारताला कसा मिळाला मान?

पुलवामातील हल्ला, त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत केलेली हवाई कारवाई आणि त्यानंतर पाकिस्तानला दिलेले प्रत्युत्तर, यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती असताना भारताने इस्लामिक देशांची संघटना असलेल्या Organisation of Islamic Countries (OIC) च्या परिषदेत भाग घेतला.

भारताला या परिषदेचं विशेष आमंत्रण होतं. पण भारत या परिषदेला मुख्य अतिथी असल्याने पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी हा परिषदेवर बहिष्कार टाकला.

पाकिस्तान, इस्लामिक परिषद

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुषमा स्वराज

एकूणच या परिषदेला भारताची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची ठरली, असं तज्ज्ञांचं मत आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)