संजय राठोड वर्षा बंगल्यावर चर्चा करुन पडले बाहेर, पुढे काय घडणार?

फोटो स्रोत, facebook
पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री संजय राठोड अडचणीत आले आहेत. पण, अद्याप पुणे पोलिसांकडून होत असलेला तपास हा संजय राठोड अडचणीत येण्याचं कारण ठरलेला नाही.
मात्र, मंगळवारी (23 फेब्रुवारी) वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी या ठिकाणी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळेच संजय राठोड अडचणीत आलेले आहेत.
याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी एक बैठक सुरू असून यामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित आहे. या बैठकीतच संजय राठोड यांच्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात येईल, असं सांगितलं जात आहे.
त्यामुळे संजय राठोड आता राजीनामा देतील की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना अभय देतील, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात तसंच राज्यात सर्वत्र कोरोना व्हायरसबाधितांचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (21 फेब्रुवारी) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला होता.
लोकांची काळजी न घेतल्यास पुन्हा लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला होता. तसंच राज्यात आगामी काळात होणारे सर्व सार्वजनिक कार्यक्रम स्थगित अथवा छोट्या स्वरूपात करावेत, असं आवाहन ठाकरे यांनी केलं होतं.
पण यानंतर दोनच दिवसात त्यांच्याच पक्षाचे सदस्य असलेले वनमंत्री संजय राठोड हे वाशिम येथील पोहरादेवी याठिकाणी दाखल झाले. विशेष म्हणजे गेल्या 15 दिवसांपासून संजय राठोड हे कुणाच्याही संपर्कात नव्हते. पूजा चव्हाण प्रकरणातही त्यांनी आतापर्यंत मौन बाळगलं होतं. हे मौन राठोड यांनी पोहरादेवी येथे येऊन सोडलं.
यावेळी संजय राठोड यांचे जवळपास 25 हजार समर्थक याठिकाणी उपस्थित होते. संजय राठोड याठिकाणी येताच त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. त्यांच्या हस्ते नगाराही वाजवण्यात आला.
अखेरीस, राठोड यांनी पत्रकारांशी संवादही साधला. पूजा चव्हाण प्रकरणात आपल्या बंजारा समाजाची बदनामी केली जात असल्याचं राठोड यांनी म्हटलं. शिवाय या प्रकरणात पोलीस तपास सुरू असल्याने आपण काहीही बोलणार नाही, असं राठोड म्हणाले.
दरम्यान, राठोड यांच्या शक्तिप्रदर्शनादरम्यान उपस्थित समर्थकांमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं दिसून आलं. बरेच लोक याठिकाणी विनामास्क वावरत होते. कोरोना प्रतिबंधक नियमांचं याठिकाणी उल्लंघन झालं.
याच मुद्द्यावरून विरोधकांनीही सरकारला कोंडीत पकरण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्ष भाजपकडून करण्यात येत होती. तसंच महाविकास आघाडीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील नेत्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली होती. कोविडच्या काळात अशारीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले होते.
त्यांनी वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या होत्या.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)




















